🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
!!ओम श्री गुरू बसवलिंगाय नम:!!
📖अनुभव मंटप 🔯
〰️〰️〰️〰️〰️
▪गणाचारी दल वचन साहित्यासह उळवीकडे रवाना
अक्कनागम्मा आणि चेन्नबसवण्णांच्या नेतृत्वाखाली शरण-शरणींचा सर्वात मोठा गट उळवीकडे (ता.जोईडा,जि.उत्तर कन्नड ,कर्नाटक) निघाला.त्या गटात शिवदेव , अक्कनागम्मा , चन्नबसवण्णा , गंगांबिका , कल्याणम्मा , मडिवाळ माचिदेव , शरण कक्कय्या , रूद्रमुनी , किन्नरी बोम्मय्या , नुलिय चंदय्या , अम्बिगर चौडय्या , गौरम्मा , लिंगम्मा , काळव्वा यांच्यासह कित्येक ज्ञात-अज्ञात शेकडो शरणांचा सहभाग होता.वचन साहित्याचे ' वचनगठ्ठे ' पाठीवर , डोकीवर , घोड्यावर , खेचरावर आणि बैलगाडीत घेऊन सर्व शरण कल्याणच्या बाहेर पडले.या गणाचारी दलाचे नेतृत्व शूरवीर गणाचारी ' मडिवाळ माचिदेव ' आणि शरण कक्कय्या करीत होते.
कल्याण राज्याच्या हद्दीबाहेर गोव्याचे ' कदंबराजे ' पेर्माडी यांच्या राज्यात ' उळवी ' येथील घनदाट अरण्यात वचनसाहित्य घेऊन जायचे ठरले होते.कल्याणहून 700 कि.मी.अंतर पायी प्रवास करत शरण उळवीच्या दिशेने निघाले." शरण कल्याण-हळ्ळी-सोलापूर-हालसंगी-निंबाळ-विजापूर-बेंगलेश्वर-गुंडाळ-मंटूर-मुधोळ-यादवाड-सत्तीगेरे-यरहट्टी-कडकोळ-तोरंगल-मुरगोड-कारिमनी-होसूर-संपगाव-कल्लूर-तिगडी-नागलापूर-कादरोळी-हुनशीकट्टी-एम के हुबळी-नंदिहळ्ळी ते कित्तूरपर्यंत जाऊन पोहोचले.तेथून पुढे शरणांचे दोन गट होऊन पहिला कित्तूर-कक्केरी-लिंगनमठ-जंगमहट्टी-जगळदबेट्ट-हल्याळ-सांबरणी-कुंभारवाडा ते उळवी , तर दुसरा गट कित्तूर-धारवाड-हुबळी-कलघटगी-सांबरणी-ते उळवी अशा दोन्ही मार्गांनी शरण वचन साहित्य घेऊन उळवीला पोहोचले."
उळवीकडे जात असलेल्या शरणांचा ' सोविदेव ' च्या सैन्यांनी पाठलाग केला.शरणांना सोलापूर येथे सिध्दरामेश्वर आणि चामलादेवी राणीने मदत केली व पुढे रवाना केले.वाटेत गुड्डापूर दानम्मानेही शरणांना संरक्षण दिले.त्यानंतर सैन्यात घनघोर लढाई झाली.त्या लढाईत शूरवीर मडिवाळ माचिदेव शहीद झाले.
'गोडची ' येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यानंतर ' एम के हुबळी ' येथे गंगांबिका , ' तिगडी ' येथे कल्याणम्मा , व
' कक्केरी ' ला डोहर कक्कय्यांना वीरमरण आले.आजही तेथे त्या-त्या शरणांच्या समाध्या अस्तित्वात आहेत. अखेर अक्कनागम्मा आणि चन्नबसवण्णांनी वचन साहित्य उळवीत आणले.तेथील घनदाट जंगलात ते काही दिवस राहिले.गोव्याच्या कदंब राजांनी त्यांना मदत केली.शेवटी उळवी येथे (ता.जोईडा, जि.उत्तर कन्नड , कर्नाटक) चन्नबसवण्णांनी आपला देह ठेवला.तेथेच त्यांची समाधी बांधून केळदी राजांनी त्यावर सुंदर स्मृतिस्थळ बांधले आहे.आज ' उळवी बसवण्णा ' या नांवाने हे स्थळ प्रसिद्ध आहे.प्रतिवर्ष फेब्रूवारीत माघ नक्षत्रावर उळवीत दहा दिवसांची यात्रा भरते.उळवीत सध्या चेन्नबसवण्णा समाधी मंदीर , नैसर्गिक गुहा , महामने , आणि वचन पाहता येते.जवळच तुंगा नदीकाठी तरिकेरे ( जि.चिकमंगळूर ) येथे अक्कनागम्मांचे समाधीस्थळ आहे.
अशा प्रकारे शरणांनी प्राणांचे बलिदान देऊन अखेर वचन साहित्य उळवीपर्यंत आणले.उळवीच्या जंगलात वचन साहित्याचे गठ्ठे सुरक्षित राहिले.कल्याणचे क्रांतीकेंद्र उळवीला आले.उळवी येथे वचनसाहित्याच्या सत्यप्रती बनल्या.उळवीतून वचन साहित्याच्या ताडपत्रांचे ' गठ्ठे ' शरणांच्या घरी वितरीत करण्यात आले.अशाप्रकारे वचन साहित्याचे रक्षण करून ते पुढील पिढ्यांना वाचता यावे म्हणून , शरणांनी त्यांचे सुरक्षितपणे जतन केले.
🙏🏻🙏🏻शरणू शरणार्थी🙏🏻🙏🏻
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯